मुंबई प्रतिनधी - कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, मदतीचा ओघ सु डिग्री झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मराठी कलाकार पुढे सरसावले असून प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. मदत करणाऱ्यांच्या यादीत मराठमोळ्या रितेश देशमुखचाही सहभाग झाला आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलियाने पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा २५ लाखांचा चेक सोपवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, “रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे!”.
दरम्यान एकीकडे मराठी कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असताना बॉलिवूड कलाकारांकडून मात्र पूर्ण निराशा झाली आहे. मदतीसाठी अद्याप एकही मोठा कलाकार पुढे आलेला नाही. मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला गरज असताना पूरग्रस्तांकडे पाठ फिरवणाऱ्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांवर टिकाही केली आहे.
अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणाचे कौतुक केले आहे. मात्र त्याचवेळी ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’ असं म्हणत हिंदी कलाकारांवर टीका केली आहे